उत्तम Performer बनायचे असल्यास उत्तम Performer बनण्याचे सूत्र समजले पाहिजे.

एखाद्या क्षेत्रातला उत्तम Performer  = त्या क्षेत्रातले उत्तम ज्ञान  X त्या क्षेत्रातली उत्तम कौशल्ये X उत्तमाची ओढ असलेली वृत्ती आणि आत्मविश्वास X उत्तुंग स्वप्ने किंवा ध्येय .

या सूत्रात प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्या गोष्टीशी गुणाकार आहे. आणि गुणाकारात एखादी गोष्ट जरी शून्य असेल तर उत्तर शून्य येते. तुम्ही आज ज्या क्षेत्रात जितक्या उंचीवर आहात तितक्या उंचीवर का आहात याचे उत्तर तुम्हाला या सूत्रात समजून येईल. जर प्रत्येक गोष्टीला दहा पैकी मार्क्स द्यायचे ठरले तर एकूण गुणाकार १०००० येतो. तर मग आज तुम्ही ज्या क्षेत्रात कार्यरत आहात त्याला अनुसरून द्या प्रत्येक घटकांना मार्क्स आणि बघा किती गुणाकार येतोय आणि कोणत्या गोष्टीमुळे उत्तरावर परिणाम नकारात्मक होतोय.पण हे करण्याच्या आधी या सूत्रातल्या प्रत्येक शब्दाचा नेमका भाव आणि नेमका अर्थ आपल्याला निसर्गाला प्रमाण मानून कळला पाहिजे हे फार महत्वाचे आहे. तरच या सूत्रात आपल्याला योग्य त्या किमती घालता येतील व आपल्याला खरे उत्तर मिळेल. आणि मग हे सूत्र आपल्याला उलगडेल व ते जगता येईल. आणि ते जगता आले तरच आपल्यातला निद्रिस्त Performer धगधगता निखारा होईल. कोळश्याकडे एकवेळ दुर्लक्ष्य केले जाऊ शकते पण धगधगत्या निखाऱ्याला दुर्लक्षित करता येत नाही.त्याची दखल घ्यावीच लागते.

ज्ञान आणि निसर्ग :

आता तुम्ही म्हणाल निसर्गालाच ‘प्रमाण’ का मानायचे ? विद्वान माणूस का नको ? माणसांच्या विचारांना दिशा देणारा धर्म का नको ? धर्मग्रंथ का नको ? देव देवता का नको ?

जरा शांतपणे विचार केला तर तुम्हाला लगेच पटेल की निसर्गाचा सगळा अविष्कार ,त्याचे देणे ,त्याचे प्रेम , त्याचा राग हा जगाच्या पाठीवरच्या प्रत्येकासाठी अगदी सारखा आहे. त्यात कोणताच भेदभाव नाही की पूर्वग्रह दूषितपणा नाही. एकवेळ आईचे प्रेम आपल्या चार मुलांसाठी थोडे थोडे वेगळे झाल्याची खूप उदाहरणे आहेत .पण आंब्याच्या झाडाने फक्त मालकाला गोड आंबे दिले आहेत आणि बाकीच्यांना आंबट असे एकदेखील उदाहरण नाही. दुसरे असे की कोणतेही ज्ञान असो , कोणत्याही क्षेत्रातले असो ते शुद्धच पाहिजे. ते  कोणत्याही अंगाने पूर्वग्रहदूषित नको ही प्रमुख अट असते. जेव्हा आपण एखाद्या विद्वान व्यक्ती कडून ,अथवा व्यक्तीने लिहिलेल्या पुस्तकातून , धर्मग्रंथातून एखादे ज्ञान घेतो तेव्हा त्या व्यक्तीची, धर्माची मते त्यात मिसळली जाण्याची खूप शक्यता असते. मग त्यातले शुद्ध ज्ञान कोणते आणि व्यक्तींची मते कोणती हे आपल्याला वेगळे काढता आले पाहिजे आणि दृष्टी आपल्याला निसर्गाकडूनच शिकता येते. आपले रोजचे जेवण याचे अगदी सरळ साधे उदाहरण आहे. आपण काहीही आणि कितीही जेवलो तरी निसर्गात: आपले शरीर मात्र शरीराला आवश्यक तो आणि तेवढाच अन्नाचा भाग ठेवते आणि बाकी बाहेर टाकून देते.पावसाळ्यात गढूळ झालेले नदीचे पाणी ,पाउस थांबला की नैसर्गिकरीत्या गाळ खाली बसून स्वच्छ होते. त्यामुळे‘शुद्धता’ हे नैसर्गिक तत्व आहे.तो निसर्गाचा सहजभाव आहे.जे निसर्गात पदोपदी जाणवते .दिसून येते.आणि मनुष्याला पण ही दृष्टी आली की त्याला पण त्याच्यापाशी येणाऱ्या ज्ञानातून कोणते ‘शुद्ध ज्ञान’ आहे आणि कोणती ‘मते’ आहेत हे सहज समजते .त्यासाठी मन ‘जागरूक’ पाहिजे. आपल्या मनातील ‘विवेक’ जागा पाहिजे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जे जे आपल्याला मनाला पटले आहे किंवा पटू पहाते आहे ते ते आपल्या ‘अनुभवाच्या’ कसोटीवर ताडून पाहण्याची सवय पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणाल गुरु वर श्रद्धा नको ? जरूर पाहिजे.पण ती अत्यंत डोळस आणि जागरूक पाहिजे . गुरूने, धर्माने धर्मग्रंथांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट आहे तशी मान्य करण्यात अनेक धोके असतात. त्यातला प्रमुख म्हणजे ‘मला ही गोष्ट माहित आहे म्हणजे तिचे ज्ञान मला आहे’ या भ्रमात तुम्ही राहता. पण There is a big difference between information and knowledge. Information always remains at very superficial level of our consciousness. It doesn’t possess any penetrating power; it doesn’t have any strength to resolve problems or to create any new thing. No one can ‘apply’ information unless it is transformed in to knowledge. इतरांचे ज्ञान हे त्यांनी अनुभवलेले सत्य असते. ते त्यांच्या तपश्चर्येचे फल असते. इतरांना गवसलेले ‘सत्य’ हे कधीच आपले ‘ज्ञान’ होऊ शकत नाही.जो पर्यंत आपल्याला मिळालेली ‘माहिती’ आपण पडताळून पाहत नाही, तपासून पाहत नाही ,त्यातले सिद्धांत स्वत: अनुभवून पाहत नाही तो पर्यंत त्या ‘माहिती’ चे ज्ञानात परिवर्तन होत नाही. एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला मला काय म्हणायचे आहे ते समजेल.

मला ‘सूर्यनमस्कार’ शिकायचा होता.त्यासाठी मी एका नामवंत शिक्षकाकडे शिकायला गेलो. आमची दहा जणांची batch होती. पहिल्या दिवशी त्यांनी आम्हाला विचारले की किती जणांना सूर्याची दहा नावे माहित आहेत. आमच्यातल्या एका चुणचुणीत तरुणाने चटकन सांगितले की दहा नावे सांगितली. आमच्या सरांना खूप अप्रूप वाटले. मग त्यांनी अजून काही प्रश्न विचारले .तर त्या तरुणाकडून पटापट उत्तरे मिळत होती. आमच्या शिक्षकांनी त्याला पुढे बोलाविले आणि त्याला म्हणाले की तुमचा सुर्यनमस्काराचा चांगला अभ्यास दिसतोय तर तुम्ही या batch चे Demonstrator व्हा. म्हणजे मी सूर्य नमस्काराच्या एकेक पोझिशन्स सांगेन आणि तुम्ही त्या सर्वांना करून दाखवा. तोही तरुण उत्साहाने तयार झाला.आम्हाला ही बरे वाटले की चला आमच्या batch मध्ये कोणीतरी छान जाणकार आहे. आणि जेव्हा आमच्या शिक्षकांनी त्याला सुर्यनमस्काराची पहिली ताठ उभे राहण्याची स्थिती सांगितली तेव्हा त्याला काही केल्या ती जमेना. त्याचा सारखा तोल जायचा . थोड्या वेळाने तोच ओशाळून म्हणाला सर मी सारे पुस्तकात वाचले आहे पण मी कधी प्रत्यक्ष सूर्य नमस्कार घातले नाहीयेत.
म्हणजे त्याला सगळी पुस्तकी माहिती होती. पण ज्ञान नव्हते.

ज्ञानाचा संबध प्रत्यक्ष जगण्याशी आहे. डायबेटीस झाल्यावर साखर खाऊ नये हे नुसते माहित असून चालत नाही तर ते प्रत्यक्षात जगावे लागते. जे. कृष्णमूर्तींचे एक खूप गाजलेले वाक्य आहे .”जे सत्य तुम्हाला समजले आहे  ते तत्काळ जगा. जर तसे नाही केले तर तेच सत्य तुमचा सर्वनाश करते.”‘खोटे बोलू नये’, कुणाचे वाईट चिंतू नये’, ‘ पेराल ते उगवेल’ अशी किती तरी सत्ये माणसांना माहित असतात पण ती जगली जातात का? आणि मग त्यावर आमचे एक ओशाळवाणे , लाजिरवाणे,केविलवाणेउत्तर असते ‘कळतंय,पण वळत नाही’.

निसर्गात सगळेच रोखठोक असते. कडूलिंबाचे गुणधर्म कधी बदलत नाहीत.पाणी कधी चढा कडून उताराकडे वाहत नाही.पाण्याने तहान शमली नाही असे कधी होत नाही. जमीन कधी बीजाला आश्रय नाकारत नाही. सूर्याची उर्जा कतीही वापरली तरी संपत नाही. निसर्गाशी माणूस कितीही असुसंकृत वागला तरी निसर्ग आपली संस्कृती विसरत नाही. निसर्गातल्या प्रत्येक गोष्टीत माहितीचा लवलेशही नाही. तिथे फक्त चहूकडे ,चहु दिशांनी फक्त ज्ञानच ज्ञान ओतप्रोत आहे. निसर्गातला प्रत्येक घटक त्याचे ज्ञान प्रत्येक क्षणी जगतो आहे. म्हणून ज्ञान या शब्दाचा भाव ,अर्थ आपल्याला निसर्गाला प्रमाण मानूनच कळला पाहिजे म्हणजे तो खऱ्या अर्थाने जगता येईल.
कारण फक्त माहितीच्या आधारे वेळ मारून लाजिरवाणे,ओशाळवाणे पोट भरता येते.पण ज्ञानामुळे आयुष्य भर ताठ मानेने तेजस्वी जगता येते.

पुढच्या सोमवारी उत्तमाची ओढ असलेली वृत्ती आणि आत्मविश्वास हे दोन शब्द निसर्गाला प्रमाण मानून अभ्यासू.

शंतनु